पंढरपूर/प्रतिनिधी
देशावर संकटाची स्थिती आहे. लोकशाहीवर प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांचा किती विश्वास आहे, याबद्दल लोकांच्या मनात शंका येते. सत्ता तुमच्या हाती आहे, तुमच्याविरोधी कोणी काही बोलतो त्याला तुरुंगात टाकण्यासाठी सत्ता घेता.मग रशियाच्या पुतिन आणि तुमच्यामध्ये फरक काय ? आज रशियात असलेली हुकुमशाही भारतात आणण्याचा तुमचा प्रयत्न असल्याची टीका माजी केंद्रीय कृषीमंञी शरद पवार यांनी पंढरपूरात केली आहे.
महाविकास आघाडीच्या माढा आणि सोलापूर या दोन लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील व प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित पंढरपूर येथे जाहीर सभेत उपस्थितांना शरद पवार यांनी मार्गदर्शन केले.यावेळी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, भूषणसिंह राजे होळकर, प्रवीण गायकवाड,रघुनाथ निंबाळकर, संभाजी शिंदे, उत्तमराव जानकर, साईनाथ अभंगराव, सक्षणा सलगर, अजिंक्य चांदणे, किरण घाडगे, संग्राम पाटील, संदीप मांडवे, दीपक वाडदेकर, सुभाष भोसले, दीपक पवार, प्रकाश पाटील,डॉ.अनिकेत देशमुख, आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतर नेत्यांनी जो मूलभूत अधिकार आपल्याला दिला त्या अधिकारावर आज संकटाचे ढग दिसत आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे. म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे. भाजप हे जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी यांना नावे ठेवतात. ज्या नेहरू यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून लढा दिला. त्यांच्यावर टीका करता, हे योग्य नाही. पंतप्रधानांनी सर्वांना बरोबर घेवून पुढे जाण्याचे काम करायला हवे. मात्र तसे होताना दिसत नाही. सत्तेचा वापर लोकांना घबरवण्यासाठी केला जातो. विरोधात बोलणा-या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकता, हे जनता खपवून घेणार नसल्याचेही पवार यांनी सांगीतले. यावेळी माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशिल मोहिते - पाटील व सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी विचार व्यक्त केले.
पंढरपूर सर्वसामान्यांच्या श्रध्देचे स्थान पंढरपूर देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या श्रद्धेचे स्थान आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या गांधी,नेहरू,इंदिराजी,यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना सातत्याने समर्थन देणारी ही नगरी आहे. स्वातंत्र्याच्या इतिहासात आणि स्वातंत्र्यानंतर नवीन महाराष्ट्र आणि भारत उभा करण्यासाठी याठिकाणच्या मतदारसंघाच्या व्यक्तींनी प्रतिनिधित्व केले असल्याचा उल्लेख पवार यांनी यावेळी केला आहे.