निलंबन न केल्यास सोलापूर-कोल्हापूर महामार्गावर रास्ता रोको करण्याचा दिला आंदाेलकांनी इशारा
दिव्य न्यूज नेटवर्क
मरवडे येथील भक्ती व नम्रता चव्हाण या दोन बालिकांच्या विषबाधा मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास कर्तव्यात कुचराई केल्याने संबंधित पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची केल्याशिवाय आम्ही आंदोलन माघारी घेणार नसल्याचा पवित्रा जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख व कार्यकर्त्यानी घेतल्याबाबतचे निवेदन राज्याचे पोलिस महासंचालकांना देण्यात आले आहे.
मरवडे येथील भक्ती व नम्रता चव्हाण यांचा श्रीखंड,बासुंदी,रबडी खाल्ल्याने विषबाधेतून मृत्यूची घटना घडली होती. या गंभीर घटनेची पिडीत कुटुंब दि.24 डिसेंबर रोजी मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले होते. यावेळी तेथील पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांना दि.24 व 25 रोजी प्रत्यक्ष भेटूनही फिर्याद घेण्यास टाळाटाळ करून कर्तव्यात कुचराई केल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.तसेच पोलिस निरिक्षक गुंजवटे हे तुमची फिर्याद आत्ता घेतली की तो आरोपी कोर्टातून दुसर्या दिवशी सुटतोय असे सांगून फिर्याद घेवून पिडीत कुटुंबाला न्याय देण्याऐवजी आरोपीची पाठराखण केल्याचा आरोप दिलेल्या निवेदनात पिडीत कुटुंबियांनी केला आहे.
या घटनेमुळे पोलिस खाते बदनाम होण्यास सर्वस्वी पोलिस निरिक्षक हेच जबाबदार असून त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्वरीत निलंबीत करण्यात यावे अन्यथा दि.24 जानेवारी रोजी सकाळी 11.00 वा. सोलापूर-कोल्हापूर महामार्गावर टोळ नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यानी निवेदनाव्दारे दिला असून याच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री,गृहमंत्री,महाराष्ट्र पोलिस महासंचालक,पोलिस महानिरिक्षक कोल्हापूर विभाग,पोलिस अधिक्षक,डी.वाय.एस.पी.मंगळवेढा आदींना देण्यात आल्या आहेत. या निवेदनावर जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख,अपंग जिल्हा संघटनेचे उत्तम सरडे,पिडीत कुटुंबातील सदस्य रघु चव्हाण व बापूसाो चव्हाण,प्रभू इंगळे,पप्पू दत्तू,बाळदादा नागणे,रघुनाथ चव्हाण आदींच्या सह्या आहेत.
डी.वाय.एस.पी. राजश्री पाटील यांना पोलिस अधिकार्यावर कारवाई करण्याचे निवेदन देताना प्रभाकर देशमुख,रघु चव्हाण व अन्य कार्यकर्ते छायाचित्रात दिसत आहेत.