दिव्य न्यूज नेटवर्क
मंगळवेढा आगारात कार्यरत असलेल्या वाहक,चालक कर्मचारी यांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन मिळावे,महागाई भत्ता 28 टक्के दराने मिळावा या मागणीसाठी संघर्ष एस.टी.कामगार युनियनच्यावतीने आगाराच्या गेटवर आक्रोश आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची उपासमार होत असल्याचा संघर्ष एस.टी.कामगार युनियनचा आरोप असून दसरा सण होवूनही सणाला वेतन मिळाले नाही.वर्षातला सर्वात मोठा सण दिवाळी तोंडावर असून तात्काळ वेतन देण्यात यावे अशी या संघटनेेची मागणी आहे.वेळेवर वेतन मिळत नसल्यामुळे कर्मचारी वर्ग कर्जबाजारी होत असल्याचे चित्र आहे.दरम्यान काही ठिकाणी कर्मचार्यांनी कर्जबाजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत.
राज्यातून जवळपास आत्महत्येचा आकडा 23 पर्यंत पोहोचला आहे.या सर्व घटनामुळे कर्मचारी वर्गात परिवहन महामंडळाविषयी असंतोष पसरत आहे.अकोला आगारात दाम नाही तो काम नाही हे आंदोलन सध्या सुरु आहे.या सर्व परिस्थितीला राज्य शासन व महामंडळ जबाबदार आहे.औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कर्मचार्यांना वेळेवर वेतन देणे बंधनकारक असतानाही त्या आदेशाची सर्रास पायमल्ली केली जात आहे.दि.18 रोजी आगाराच्या गेटसमोर आक्रोश आंदोलन करून राज्यात मृत पावलेल्या कर्मचार्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी अशोक चव्हाण,आशिषकुमार वाघमारे,राजेंद्र म्हेत्रे,मधुकर आदटराव,धनाजी लोखंडे,संजय मस्के,सुरेश राठोड,शिवाजी लोखंडे,खंडू शिंदे,अशोक पाटील,चंद्रमणी मस्के,पांडूरंग अहिरे यांच्यासह अन्य संघटनेतील पदाधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.