मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात वटपौर्णिमेचा सण वडाच्या झाडाची महिलांनी पूजा अर्चा करून झाडाला सात फेरे मारत जन्मोजन्मी...हाच पती मिळू दे अशी परमेश्वराकडे प्रार्थना करीत उत्साहाने साजरा केला. दरम्यान हा महिलांचा सण असल्याने महिलांनी अंगावर शालू,व विविध सोन्याचे दागिने परिधान केल्याचे चित्र होते.
मंगळवेढा शहरातील श्री.दामाजीपंताच्या मंदिर परिसरात असलेल्या व तीर्थक्षेत्र माचणूर येथील सिध्देश्वर मंदिर परिसरातील वडाच्या झाडाला महिलांनी एकत्र येवून हिरव्या बांगडया,विडयाची पाने,सुपारी,पैसे,खोबर्याचा नैवेद्य,आंबे असे साहित्य घेवून मोठया भक्तीभावाने हळदी कुंकू वाहून प्रत्येक नववधूसह विवाहित महिलेने पूजा अर्चा केली. या दरम्यान महिलांनी वडाच्या झाडाला दोर्याच्या सहाय्याने फेरे मारीत जन्मोजन्मी हाच पती मिळो अशी परमेश्वराकडे अंतःकरणापासून विनवणी केली.पतीसाठी त्यांनी उपवासही केला होता. पूजा अर्चानंतर तो उपवास सोडण्यात आला.पुजेप्रसंगी चुडा घालण्याची प्रथा असल्याने प्रत्येक महिलांनी हातामध्ये चुडे भरून घेतले.
सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळविण्यासाठी यमराजाला भक्तीने संतुष्ट केले. ज्या वृक्षाखाली सावित्रीचे पती जीवंत झाले ते वडाचे झाड असल्याने प्रत्येक वर्षी महिला वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा रूढ झाली असल्याची अख्यायिका सांगितली जाते.हिंदू पंचांगाप्रमाणे ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.त्यामुळे वडाच्या झाडाला या महिन्यात अनन्यसाधारण महत्व आहे.वड हा वृक्ष अनेक वर्षे आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो. तसेच वडाच्या झाडांमागे काही शास्त्रीय कारणे आहेत.या झाडामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असल्याचे सांगण्यात येते.