परिस्थितीवर मात करुन महाराष्ट्राला मिळालेला एक तडफदार अधिकारी:-विश्वास नांगरे पाटील... - Divyaprabhat News

Breaking News

Monday, July 13, 2020

परिस्थितीवर मात करुन महाराष्ट्राला मिळालेला एक तडफदार अधिकारी:-विश्वास नांगरे पाटील...



दिव्य न्युज नेटवर्क

          स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करायचं म्हटलं तर सर्वात आधी डोळ्यासमोर नाव येत ते म्हणजे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचं. महाराष्ट्रातील अनेक तरुणांसाठी विश्वास नांगरे पाटील एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. एका छोट्याशा गावातून आलेल्या विश्वास नांगरे पाटील यांनी फक्त कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवलेलं आहे.
        विश्वास नांगरे पाटील यांचा प्रवास अगदी छोट्याशा खेड्यातून सुरु झाला होता.बत्तीस शिराळा तालुक्यात वारणेच्या काठावर, सह्यादीच्या कुशीत कोकरुड नावाचं विश्वास नांगरे पाटील यांचं गाव आहे.विश्वास नांगरे पाटील यांचे वडील नावाजलेले पैलवान आणि गावचे सरपंच होतं. आपला मुलगादेखील पैलवान व्हावा अशी त्यांची सुरुवातीला इच्छा होती. मुलाने शाळेपेक्षा तालमीत जावं अशी त्यांची इच्छा होती
         
विश्वास नांगरे पाटील यांचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं आहे. कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठातून त्यांनी बीएचं शिक्षण पूर्ण केलं. सेवेत असताना त्यांनी एमए पूर्ण केलं. तसंच एएलबीचं शिक्षणही घेतलेलं आहे. ट्रेनिंग सुरु असताना त्यांनी उस्मानाबादमधून एमबीए पूर्ण केलां विश्वास नांगरे पाटील यांचे वडील पैलवान आणि सरपंच असल्याने वर्गात त्यांचा धाक असायचा. इतर कोणीही शिक्षक भीतीने त्यांना काही बोलायचं नाही. पण एकदा एका शिक्षिकेने वर्गात आल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांना दोन कानशिलात लगावून आपलं अस्तित्व निर्माण कर असं सुनावलं. विश्वास नांगरे पाटील यांना त्यादिवशी ती गोष्ट प्रचंड मनाला लागली. घरी गेले आणि वडिलांना आपल्याला ओळख निर्माण करायची आहे, शाळेत जाणार नाही असं सांगितलं.
         विश्वास नांगरे पाटील यांनी आपण गावातील शाळेत जाणार नाही सांगितलं. वडिलांनी समजावल्यावर शिराळ्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जाण्यासाठी ते तयार झाले. सकाळी आठ वाजता बस पकडून ते दीड तासांचा प्रवास करत होते. आपली ओळख निर्माण करायची असल्याने तुम्ही अजिबात शाळेत यायचं नाही असं विश्वास नांगरे पाटील यांनी वडिलांना बजावलं होतं.
विश्वास नांगरे पाटील यांचा प्रवासात बराच वेळ जात असे. गायकवाड नावाच्या एका सरांच्या हे लक्षात आलं. त्यावेळी विश्वास नांगरे पाटील दहावीत होते. त्यांनी विश्वास नांगरे पाटील यांना आपल्याकडे राहण्याचा सल्ला दिला.गायकवाड सरांना पहाटे तीन वाजता उठून व्यायाम करायची सवय होती. त्यांनी विश्वास नांगरे पाटील यांनाही सकाळी तीन वाजता उठवण्यास सुरुवात केली.पहाटे तीन वाजता गार पाण्याने आंघोळ करुन विश्वास नांगरे पाटील ३.३० ते ८.३० असा पाच तास रोज ते अभ्यास करत होते.अभ्यासासाठी विश्वास नांगरे पाटील यांना टाइमटेबल आखलं होतं. सकाळी चार तास, दुपारी चार तास आणि संध्याकाळी चार तास असा अभ्यास ते करायचे.यामुळे अभ्यासात हुशार नसलेले विश्वास नांगरे पाटील १० वीच्या परीक्षेत ८८ टक्के मिळवून तालुक्यात पहिले आले.त्यामुळे आपण हात मारु तिथे पाणी काढू शकतो हा विश्वास त्या तरुण वयात निर्माण झाला. या सवयीचा फायदा त्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना झाला.
            सर्वांचं ऐकून विश्वास नांगरे पाटील यांनी ११ वीला सायन्सला प्रवेश घेतला. पण बारावीला असताना भूषण गगराणी यांचं व्याख्यान ऐकलं आणि त्यातून विश्वास नांगरे पाटील यांनी स्पर्धा परीक्षेचं ध्येय बांधलं. गगराणी यांचं भाषण ऐकल्यानंतर पहिल्यांदा विश्वास नांगरे पाटील यांना स्पर्धा परीक्षेची माहिती मिळाली. यामधून जिल्हाधिकारी, सचिव, आयुक्त बनता येतं, तसंच ही परीक्षा मराठीत देता येते याची त्यांना पहिल्यांदाच माहिती मिळाली
          विश्वास नांगरे पाटील दिल्ली किंवा मुंबईत अभ्यासासाठी असायचे तेव्हा त्यांचे वडील नेहमी पोस्टकार्ड पाठवत असत. त्यामध्ये ते गावाकडील परिस्थिती काय आहे, पैसे काही कमी पडत आहेत का ? काही अडचण येतीये का ? अभ्यास कर अशी विचारपूस करायचे. या पत्राच्या शेवटी ते नेहमी भावड्या, माझे डोळे मिटण्याआधी तुला आयएएस अधिकारी होऊन लाल दिव्याच्या गाडीतून आल्याचं पहायचं आहे असं लिहिलेलं असायचं.
        मी अनेक प्रेरणा देणारी पुस्तकं वाचली, पण मनात आग पेटवणारी ओळ मला त्या पत्रात सापडली असं विश्वास नांगरे पाटील सांगतात.आपल्या त्या शेतकरी बापासाठी अभ्यास करायचा, स्वप्न पूर्ण करायचं हे लहानपणीच विश्वास नांगरे पाटील यांनी ठरवलं होतं.अभ्यासासाठी महागडी पुस्तकं नसल्याने विश्वास नांगरे पाटील यांनी मित्रांच्या मदतीने गावात स्टडी सेंटर उभं केलं होतं.
          १९९५ रोजी विश्वास नांगरे पाटील एमपीएससीच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाले. पण मुलाखतीत त्यांना २१ वय असल्याने खूप तरुण असल्याचं सांगत लगेचच बाहेर पाठवून देण्यात आलं. लेखी परीक्षेत विश्वास नांगरे पाटील यांना ५३० मार्क होते. पण मुलाखतीत फक्त ७० मार्क दिले होते. विश्वास नांगरे पाटील यांना एकही पोस्ट मिळाली नव्हती.
          १९९६ वर्ष त्यांच्या आयुष्यातील खडतर वर्ष होतं. त्यांनी हारदेखील मानली होती. पण वडिलांनी त्यांना पुन्हा एकदा जिद्दीने उभं राहण्यास सांगितलं.परीक्षा देणं म्हणजे सात आठ लाख मुलांमधून अगदी पहिल्या १०० -२०० मुलांमध्ये येण्याची आपली तयारी असली पाहिजे. यामुळे विश्वास नांगरे पाटील यांनी प्लॅन बीदेखील आखला होता.
       स्पर्धा परीक्षेत यश नाही मिळालं तर एमए करुन शिक्षक होण्याचं विश्वास नांगरे पाटील यांनी ठरवलं होतं. हा त्यांचा प्लान बी होता.
        यासाठीच १२ वीनंतर विश्वास नांगरे पाटील आणि त्यांचा चुलत भाऊ आनंद यांनी इंजिनिअर आणि मेडिकल सोडून आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. जर तुमचा प्लान बी तयार असेल तर अपयश आल्यानंतर त्रागा होत नाही असं विश्वास नांगरे पाटील सांगतात.
        मुंबईत आमदार निवासमध्ये राहत असताना विश्वास नांगरे पाटील यांना कधीतरी उदास वाटायचं, निराशा यायची. त्यानंतर ते मरीन ड्राइव्हला जाऊन बसत असत. सुर्यास्त पाहताना अनेकदा त्यांच्या डोळ्यातून पाणी यायचे.
             १९९७ ला पुन्हा एकदा विश्वास नांगरे पाटील यांनी अभ्यास सुरुवात केली.
त्यानंतर विश्वास नांगरे पाटील अंबिवली येथे आपल्या आत्त्याकडे राहण्यास आले. रोज सकाळी ३.३० वाजता पहिली ट्रेन पकडून ते सीएसटीला पोहोचत. ग्रंथालयात पोहोचणारे ते पहिले असायचे. दिवसभर तिथे ते अभ्यास करायचे.
           १९९७ रोजी विश्वास नांगरे पाटील यांनी सलग १३ परीक्षांमध्ये यश मिळवल.
           १९९७ मध्ये विश्वास नांगरे पाटील फक्त आयपीएस झाले नव्हते तर एमपीएससीमधून उप-जिल्हाधिकारी म्हणूनही निवडले गेले होते. सेल्स टॅक्समध्येही इन्स्पेक्टर म्हणून निवड झाली होती. पीएसआयच्या फिजिकलपर्यंत गेले होते.
          मुलाखतीची वेळ आली तेव्हा विश्वास नांगरे पाटील फार घाबरले होते. लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ यांचं पॅनेल त्यांची मुलाखत घेणार होतं. इंग्रजी चांगली नसल्याने ते घाबरले होते. पण ते आत्मविश्वासाने सामोरे गेले.
      यावेळी एक प्रश्न विश्वास नांगरे पाटील यांना विचारण्यात आला तो म्हणजे, या जगात तू का आला आहेस ? यावर त्यांनी सांगितलं की, “मी संघर्ष करण्यासाठी आलो आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन इथपर्यंत पोहोचलो आहे, जर सिस्टीममध्ये आलो तर वाईट गोष्टींविरोधात संघर्ष करणे.
          विश्वास नांगरे पाटील १९९७ रोजी ३०० पैकी २१० गुण मिळवत महाराष्ट्रात पहिले आले अपयशाला कधी घाबरायचं नाही, आयुष्यात चढ-उतार येत असतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना तर निराशा पाचवीला पुजलेली आहे. त्यामुळे प्रयत्न आणि कष्ट करत राहणं गरजेचं आहे असं विश्वास पाटील सांगतात.
       
वेळेचं महत्व सांगताना विश्वास पाटील सांगतात, एका वर्षाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा, एका महिन्याचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर आठव्या महिन्यात बाळाला जन्म देणाऱ्या आईला विचारा, एका आठवड्याचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा. एका दिवसाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर रोजंदारीवर जाणाऱ्या कामगाराला विचारा. एका तासाचं महत्त्व प्रेयसीची वाट पाहणाऱ्या प्रियकराला विचारा. एका मिनिटाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर ज्याची ट्रेन सुटली आहे त्याला विचारा आणि एका सेकंदाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर जो नुकताच अपघातातून वाचला आहे त्याला विचारा. आणि मिलीसेकंदचं (सेकंदाच्या दहाव्या भागाचं) महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्या धावपटूला विचारा.

Pages