जिल्ह्यात अडकलेले तामिळनाडूचे 981 नागरिक स्वगृही रवाना.... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, May 9, 2020

जिल्ह्यात अडकलेले तामिळनाडूचे 981 नागरिक स्वगृही रवाना....




 पंढरपूर/प्रतिनिधी 

      कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका लक्षात शासनाने लॉकडाऊनची घोषणा  केली. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये अडकलेल्या इच्छुक नागरिक, विदयार्थी, पर्यटक आणि मजूर यांना स्वगृही जाण्यासाठी शासनाने कार्यपध्दती जाहीर  केली आहे.  त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अडकलेल्या तामिळनाडू येथील 981 नागरिकांना पंढरपूर रेल्वे स्थानकातून तिरुचिरापल्लीकडे रवाना करण्यात आले.
        
पंढरपूर रेल्वे स्थानकावरुन  आज दुपारी दोन वाजता तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीकडे 981 मजूर, कामगार व विद्यार्थ्यांना रवाना करण्यात आले. यावेळी प्रांतधिकारी सचिन ढोले, उपजिल्हाधिकारी दिपक शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, तहसिलदार डी.एस.कुंभार, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर तसेच रेल्वे स्टेशनचे प्रबंधक जे.पी. चनगौड, यातायात निरीक्षक ए. के. श्रीवास्तव उपस्थित होते.
         कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने आवश्यक उपाययोजना  करुन  परराज्यातील  नागरिक,  विदयार्थी, पर्यटक आणि मजूर यांची   व्यवस्था  जिल्ह्यातच करण्यात आली होती. त्यासाठी  प्रशासनाने जिल्ह्यातच विविध ठिकाणी  निवाऱ्याची, भोजनाची व आरोग्य तपासणीची  व्यवस्था केली होती. तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीकडे 981 मजूर, कामगार व विद्यार्थ्यांना रवाना करण्यात आले.
           यावेळी सर्व नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्यामध्ये कुठलेही कोरोना आजाराची लक्षणे नसल्याने त्यांना गावाकडे जाण्यास परवानगी देण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून प्रत्येक माणसी 560 रुपये तिकीट दर आकारण्यात आला होता. रेल्वेमध्ये बसताना पाणी व फुड पॅकेटची सोय करण्यात आली होती. रेल्वे डब्यात सामाजिक अंतर ठेवून त्यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. तसेच संपूर्ण रेल्वेचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. सदर रेल्वे तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीमध्ये रविवारी दुपारी 12 वाजता पोहचणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने दिल्या प्रवासाठी शुभेच्छा.......
           तामिळनाडूतील सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अडकलेल्या 981 इच्छुक नागरिक, विदयार्थी, पर्यटक आणि मजूर यांना स्वगृही जाण्यासाठी प्रशासनाकडू विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती.   जिल्ह्यामध्ये सोलापूर शहर-179, उत्तर सोलापूर 28, मंद्रुप-47, पंढरपूर 610 तसेच उस्मानाबाद येथील 90 अशा 981 जणांना पंढरपूर रेल्वे स्थानकावरुन  स्वगृही रवाना करण्यात आले. प्रवाश्यांना नाष्टा-अन्न पाकीटे व पाण्याची बाटली देत प्रवासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी  तामिळनाडूच्या नागरिकांनी आनंद व्यक्त करीत ‘थॅक्य  यु महाराष्ट्र’ अशा घोषणा दिल्या. प्रशासनाने  आनंदाने त्यांना निरोप दिला.  






Pages