७५ हजार कोटी खर्च शासनानं केला आहे!मग कुठलं पॅकेज हवं ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई/प्रतिनिधी
करोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. सध्या राज्यात असलेली परिस्थिती आणि यापुढील काळात सरकारकडून करण्यात येणाऱ्या कामांविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन शिथिल करण्यासंदर्भातही भाष्य केलं.
उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला सरकारच्या वतीनं केल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले,”मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड लाखांच्या जवळपास असेल, अशी भीती केंद्रीय आरोग्य पथकानं व्यक्त केली होती. पण, राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश आलेलं दिसत आहे. सध्या राज्यात फक्त ३३ हजार करोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत आहे. काही जण सरकारनं पॅकेज घोषित करावं अशी मागणी करत आहेत. पण, सध्याची परिस्थिती आरोग्य क्षेत्रावर लक्ष देण्याची आहे. आतापर्यंत अनेक लाख कोटींचे पॅकेज देण्यात आले. मात्र, तो फक्त रिकामा खोका निघाला. त्यामुळे पॅकेज देण्यापेक्षा मजुरांसह विविध भागातील गरजुंना मदत देणं महत्त्वाचं आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“एसटी बसेसच्या ५ मे ते २३ मे या काळात तब्बल ३२ हजार फेऱ्या झाल्या आहेत. ३ लाख ८० हजार लोकांना घरी पाठवलं आहे. त्याचबरोबर रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून काही लाख लोकांना घरी पाठवण्यात आलं. त्यासाठी ७५ हजार कोटी खर्च शासनानं केला आहे. मग कुठलं पॅकेज हवं? इतर राज्यातून आणि देशातून लोक परत येत आहेत. बाहेरून येणाऱ्यांना आपण क्वारंटाइनची सोय करतोय. ७ जूनपर्यंत १३ विमानांतून आणखी नागरिक महाराष्ट्रात येणार आहेत. आज सकाळी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी यांच्याशी बोलणं झालं. त्यांच्याशी चर्चा करतानाही मी त्यांना बोललो की, ‘सरकारला अंदाज घेऊ द्या,’ असं सांगितलं. पाच वर्ष आमच्या सरकारनं काय केलं? लॉकडाउन केदंला. ही काही अभिमानाची गोष्ट नाही. आम्हाला सगळं सुरू करायचं आहे. उलट वाढवायचं आहे. पण, ते वाढवताना खबरदारी घेऊन आम्हाला ते करायचं आहे. प्रवासी येणार म्हणजे तुम्ही काय करणार? राज्य सरकारनं काय करायचं. विमानतळं सुरू करायची, तर कर्मचारी किती लागणार याचा विचार करावा लागणार. शेती आणि शिक्षण याविषयीचा निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यासंदर्भात विचार विनिमय करून निर्णय घेतला जाईल,” असं ठाकरे म्हणाले