पंढरपूर/प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये शासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांच्या हाताला काम नाही. तालुक्यातील शिधापत्रिका धारकांबरोबरच अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ठ नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारक गरीब व गरजु नागरिकांना रेशन धान्य उपलब्ध करुन द्यावे असे, आमदार भारत भालके यांनी सांगितले.
यावेळी आमदार भारत भालके म्हणाले, ‘लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये अडकलेल्या इच्छुक नागरिक, विदयार्थी, पर्यटक आणि मजूर यांना स्वगृही जाण्यासाठी शासनाने कार्यपध्दती जाहीर केली आहे. त्याअनुषंगाने मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यातून तसेच परराज्यातील चार हजार नागरीक आतापर्यंत तालुक्यात आलेले आहेत. येणाऱ्या नागरिकांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी. तसेच त्यांना होम क्वारंईन करुन लक्ष ठेवावे. शहरात सर्वजनिक ठिकाणी नगरपालिकेने फवारणी करुन निर्जंतुकीकरण करावे अशा सूचनाही आमदार भालके यांनी दिल्या. प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या कोव्हीड हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आरोग्य सोयी सुविधांची माहिती घेतली. त्याचबरोबर चार तालुक्यासाठी स्वॅब तपासणी सेंटरची मागणी शासनाकडे केली असल्याची माहिती आमदार भालके यांनी दिली.
शासनाने दिलेल्या सुचनेनुसार तालुक्यातील सर्व गरजु लोकांना रेशन धान्य पुरवठा करण्यात येत आहे.तसेच बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच त्यांना देण्यात येत असलेल्या आवश्यक सुविधांची माहिती प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिली.