पंढरपूर/प्रतिनिधी
कर्मवीर औदुंबर आण्णा पाटील यांचे पंढरपूर तालुक्याच्या विकासामध्ये मोठे योगदान आहे. पंढरपूर तालुक्याच्या हरितक्रांती, धवलक्रांती व औद्योगीक क्षेत्रामध्ये औंदुबरआण्णा पाटील यांनी आदर्श निर्माण करून पंढरपूर तालुक्याचे नाव अख्या महाराष्ट्रात केले. स्व.यशवंतराव चव्हाण, स्व. कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील, शरद पवार यांनी आदर्श रस्ता दाखविला आहे. त्या आदर्श रस्त्यावरूनच जाणार असल्याचे आ.भारत भालके यांनी म्हटले आहे. ते कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बळीराम साठे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील उपस्थित होते.
यावेळी मोफत सर्वरोग, ह्रदयरोग शिबीर, मोफत नेत्रतपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व रक्तदान शिबीर आदींचे उद्घाटन करण्यात आले पुढे बोलताना आ.भालके म्हणाले की, आजचा दिवस हा खूपच वेगळा दिवस आहे. एका बाजूने सासर्याचा तर दुसर्या बाजूने दिराचा फोन येत आहे मला लवकरच मुंबईला पोहोचायचे आहे. त्यामुळे माझी अवस्था अतिशय दैयनीय झाली आहे. त्यामुळे मला लवकरात लवकर मुंबईला पोहोचणे गरजेचे आहे.
आज कर्मवीर औंदुबरआण्णा पाटील यांची 96 व्या जयंती जयंती साजरी करत आहोत. विठ्ठल हॉस्पिटलचे काम प्रगतीपथावर आहे. युवराज पाटील यांनी विठ्ठल हॉस्पिटल सक्षमपण चालविले आहे. सध्या संस्था चालविणे अवघड आहे. तरी सुद्धा येणार्या काळामध्ये शासन बदलाच्या मार्गावर आहे. सर्वतोपरी विठ्ठल हॉस्पिटलला जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिल असेही आ.भालके यांनी सांगितले.
यावेळी मोहोळ तालुक्याचे माजी आ. राजन पाटील यांनी स्व.औदुंबरआण्णा पाटील हे पंढरपूर तालुक्यातील धवलक्रांतीचे जनक होते. त्यांनी स्थापन केलेल्या सर्व संस्था आदर्श आहेत. स्वत:चा संसार नेटका केला नाही. पण प्रत्येक शेतकर्यांचा संसार औदुंबरआण्णांनी नेटका करून दाखविला आहे.स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते शरद पवार यांच्या पर्यंत औदुंबरआण्णांनी पक्षावर शेवटपर्यंत निष्ठा ठेवली. अगदी निस्वार्थी पणे एक आदर्श व्यक्ती म्हणून औदुंबरआण्णांकडे पाहिले जाते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीराम साठे आपल्या भाषणामध्ये खंत व्यक्त करत सध्याच्या राजकारण किती निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगत औदुंबर आण्णांच्या काळातील राजकारण आणि आताचे राजकारण यामध्ये कितीतरी तफावत आहे. पक्षावरील निष्ठा सध्या कमी होत आहे. स्वार्थाचे राजकारण सध्या चालू आहे. आजचा दिवस अतिशय भयंकर आहे. त्यामुळे राजकारण नेमके कोणत्या दिशेने चालले आहे हेच कळत नाही. स्व.औदुंबरआण्णा यांनी विठ्ठल हॉस्पिटल उभा करणे आणि ते चांगल्या रितीने चालविणे ते स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्याचे काम युवराज पाटील हे करित आहेत. पुढील काळासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल नागटिळक तर आभार प्रविण भोसले यांनी मानले.
यावेळी विठ्ठलचे संचालक मोहन कोळेकर, शांतीनाथ बागल, ज्ञानेश्वर गायकवाड, दिनकर पाटील, सुभाष भोसले, सुधीर भोसले, नारायण जाधव, गणेश पाटील, प्रकाश पाटील, साधना राऊत, रामहरी रणदिवे, हरिदादा घाडगे, बाळासाहेब पाटील, नगरसेवक प्रशांत शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष विलास साळुंखे, अॅड.आनंद पाटील,शरद चव्हाण, रणजित पाटील, प्रविण भोसले, संजय पाटील, सचिन साबळे, डॉ. रोकडे, डॉ. संजय पाटील, डॉ.जमदाडे, डॉ. लाड, डॉ. अभिवंत आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, सर्व डॉक्टर, सर्व कर्मचारी, विठ्ठलचे आजी-माजी संचालक, सभासद व आण्णा प्रेमी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.