घरात पाणी जाऊनही पूरग्रस्त मदतीपासून वंचित.
पंढरपूर/प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चंद्रभागेला पूर आला होता पूराचे पाणी पंढरपूर शहरातील सखल भागांमध्ये पाणी शिरले होते. यामुळे अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून घराचे व संसार उपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु महसूल विभागाच्या व नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून आंबेडकर नगर येथील काही घरांच्या पंचनाम्यात घरामध्ये पाणी शिरल्याचा व संसार उपयोगी साहित्यांचे नुकसान झाल्याचा उल्लेख करण्यात आला नसल्याने अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरूनही शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. या कडे जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून पूर बाधित नागरिकांच्या घरांची जबाबदार अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पहाणी करून मदत निधी देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत नगरसेवक डी.राज सर्वगोड यांनी येथील नागरिकांना घेऊन प्रांतअधिकारी सचिन ढोले , तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देऊन या भागातील पूर बाधित घरांचे चित्रीकरण केलेले व्हिडिओ तसेच फोटो दाखवून मदतीपासून वंचित पूरग्रस्तांच्या घराचे पंचनामे तपासून मदत देण्याची मागणी पूरग्रस्तांमधून करण्यात आली आहे .
यावेळी ज्येष्ठ नागरिक रामदास सर्वगोड, बाळासाहेब साखरे, रवींद्र सर्वगोड, अशोक सर्वगोड, निलेश जाधव, प्रशांत सर्वगोड,सुरेश सर्वगोड यांच्या सह पूरग्रस्त नागरीक उपस्थित होते