वीर व उजनी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे भीमा नदी काठी निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. पुरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी तालुक्यातील आतापर्यंत 975 कुटूबांच्या बँक खात्यावरती प्रत्येकी 10 हजार रुपयांप्रमाणे 97 लाख 50 हजार रुपये जमा करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.
धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे तालुक्यातील नदी काठावरील 43 गावांत व पंढरपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरीकांना घरातील भांडी, कपडे, घरगुती वस्तूच्या नुकसानीकरीता शासनाच्या वतीने मदत देण्यात येत आहे. पूरस्थितीमुळे तालुक्यात एकूण 4 हजार 790 कुटूंब बाधित झाली असून, आतापर्यंत 3 हजार 654 कुटूंबांचे पंचनामे झाले असून, त्यापैकी 975 बाधितग्रस्त कुटूंबांच्या बँक खात्यावरती 97 लाख 50 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच त्यांना 286.7 क्विंटल गहू व 286.7 तांदूळ पुरवठा करण्यात आला असल्याचेही तहसिलदार बर्गे सांगितले.
तालुक्यातील पात्र बाधितग्रस्त प्रत्येक कुटूंबांला शासनाच्या वतीने मदत देण्यात येणार आहे. ही मदत थेट बाधितग्रस्तांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचेही तहसिलदार बर्गे यांनी सांगितले.