वीर व उजनी धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने, नीरा व भीमा नदी काठी पुरस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील 3 हजार 556 कुटूबांतील 16 हजार 250 नागरीकांचे प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. पूरस्थित मदत व बचाव कार्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
भीमा नदीत संगम येथे उजनी धरणातून 1 लाख 20 हजार क्सुसेक्स तर वीर धरणातून 62 हजार 173 क्युसेक्स पाणी सुरु असल्याने भीमा नदीपात्रात 2 लाख 46 हजार 955 क्युसेक्स इतक्या वेगाने पाणी येत आहे. पुरस्थिती मुळे पंढरपूर तालुक्यातील नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील अंबाबाई पटांगण, व्यासनारायण झोपडपट्टी परिसर, लखुबाई मंदीर परिसर येथील 4 हजार 999 नागरीकांना 65 एकर, रामबाग, ठाकुरबुवा मठ आश्रम शाळा तसेच मुंबईकर मठ येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील पिराची कुरोली, पुळूज, पुळूजवाडी, विटे, खरसोळी, पोहोरगांव, तारापूर, विटे, तारापूर, अजनसोंड पटकुरोली, खेड भोसे, देवडे, गुरसाळे, शेगांव दुमाला आदी नदी काठच्या गावांतील 11 हजार 251 नागरिकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, समाज मंदिरे, मंदिरे आदी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
याठिकाणी प्रशासनामार्फत आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत आवश्यक आरोग्य पथकासह औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे.तसेच प्रशासनाकडून बाधित कुंटूबांना 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ व 5 लिटर केरोसीन देण्यात येणार आहे.ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे.त्या ठिकाणचे पाणी ओसरल्यावर तात्काळ पंचनामे करण्यात येणार आहेत. पूरस्थितीत नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.