त्या तलाठ्याला निलंबीत करण्याची प्रहार संघटनेचे
तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी केली मागणी...
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा येथील तहसील कार्यालयात आज सोमवार बाजार चा दिवस असताना येथील एका दारुड्या तलाठ्याने चक्क ऑन ड्युटी दारूच्या नशेत गोंधळ घालत नागरिकांशी अरेरावी पणे वागून महसूल खात्याची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी येथील रावसाहेब वाघमारे हे अरळी येथे तलाठी म्हणून कारभार पाहत होते. परंतु गेल्या तीन महिन्यापूर्वी वरिष्ठांचा फोन उचलताना उद्धट भाषा वापरली त्यामुळे त्यांना शिक्षा म्हणून मंगळवेढा तहसील कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ते तहसील कार्यालयात आवक-जावक विभागात काम पाहत होते. दि. 28 रोजी त्यांची पुन्हा अरळी येथे नियुक्ती केली होती.त्यांना रीलिव्ह देखील केले होते.परंतु काल दि। 29 रोजी त्या तलाठ्याने अरळी येथे न जाता येथील तहसील कार्यालयात आवक-जावक विभागातच कामावर आला.तोही तूर्र होवून.
काल दुपारी तीनच्या सुमारास दारूच्या नशेत येथील विभागाचा कारभार सांभाळत असताना येणाऱ्या नागरिकांशी उद्धटपणे बोलत होता काहींना शिवीगाळ करत अर्वाच्य भाषेत भाषा बोलत होता. ही घटना माहिती होताच याठिकाणी प्रहार चे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे व जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी हे दाखल झाले. त्यांनी या दारुड्या तलाठ्याची तक्रार नायब तहसीलदार हेडगिरे यांच्याकडे केले असता त्यांनी सदर तलाठ्यास बोलावून कानउघाडणी केली.
तुमच्या या चुकीच्या वागण्यामुळे महसुली विभागाची अब्रू वेशीला टांगली जात आहे.तुमच्या बेजबाबदार वागण्याने महसूल खाते बदनाम होत आहे असे म्हणत त्याची खरडपट्टी केली. याबाबत तहसीलदार मदन जाधव साहेब यांना या प्रकाराची माहिती दिली जाईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान शासनाचा पगार घेऊन कर्तव्यावर असताना दारूच्या नशेत महसूल कार्यालयात वावरणाऱ्या या तलाठ्याकडे आज दिवसभर त्यांच्या एकाही सहकारयाचे लक्ष कसे काय गेले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ऐन बाजार च्या दिवशी एक तलाठी दारूच्या नशेत नागरिकांशी असभ्य भाषा वापरत असल्याचा प्रकार दुर्दैवी असून महसूल खात्याचा भोंगळ कारभार समोर आला आहे. दरम्यान प्रहार चे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी संबंधित तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्याच्यावर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकाराबाबत नायब तहसीलदार श्री.चंद्रकांत हेडगिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर तलाठ्याला दि. 28 रोजी रिलीव्ह केले असून त्याने आज नेमलेले ठिकाण जाणे अपेक्षित असताना तो येथील विभागात कसा काय काम करीत होता याची चौकशी केली जाईल असे सांगितले.