पंढरपूर/प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मठ आणि धर्मशाळेमध्ये बाहेरील वारकरी व नागरिक वास्तव्यास असता कामा नये. जर विनापरवाना कुठलेही नागरिक पंढरपुरात वास्तव्य करत असतील. तर संबंधित मठ चालक आणि धर्मशाळा यांनी तात्काळ प्रशासनास तशी माहिती कळवावी. असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव असल्याने शासनाकडून आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी आवश्यकतेनुसार निर्देश पारित होतील. मात्र तत्पूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहराची काळजी घेण्याच्या दृष्टीने येथील मठामध्ये अथवा धर्मशाळांमध्ये विनापरवाना बाहेरील कुठलाही नागरिक येत असेल. तर संबंधित नागरिकाची माहिती प्रशासनास मठ चालकांनी कळवणे बंधनकारक आहे. जेणेकरून कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव होणार नाही. याची दक्षता प्रशासनाला घेता येईल. यादृष्टीने मठाचे व्यवस्थापक आणि धर्मशाळा चालक यांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचेही श्री ढोले यांनी सांगितले.