मुंबई/प्रतिनिधी
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाला देशवासीय देणार प्रतिसाद...
भारतात करोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या २९४ च्या आसपास आहे आणि आतापर्यंत ४ लोकांचा जीव या व्हायरसनं घेतला आहे. या करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यूचं आवाहन केलंय. समजून घेऊ हा जनता कर्फ्यू नेमका काय आहे.
१. घरातच राहा, बाहेर पडूच नका.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानुसार रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत घरातून बाहेर पडू नका. एवढंच नाही तर सोसायटीतही फिरू नका. गार्डन सुरू नाहीचेत, त्यामुळे तिकडे जाण्याचाही विचार करून नका. घरातल्यांशिवाय इतर कोणालाही भेटू नका.
२. केव्हा निघू शकता बाहेर.
कोणत्याही प्रकारची वैद्यकीय आणीबाणीची स्थिती आलीच तर तुम्ही घरातून बाहेर पडू शकता. हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्यांना कोणीही थांबवणार नाही. पण, तसं काही नसेल तर बाहेर पडूच नका. याशिवाय तुमच्या आसपासच्या दूध-ब्रेडच्या दुकानात आवश्यक असल्यास जाऊ शकता.
३. कोण-कोण घरातून बाहेर निघू शकतं?
पोलीस, मीडियाचे प्रतिनिधी, डॉक्टर आणि सफाईची जबाबदारी असलेले कर्मचारी घरातून बाहेर पडू शकतात. कारण त्यांचं काम अत्यावश्यक सेवांमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तेच सांगितलंय. ते म्हणाले होते की, या सर्वांची जबाबदारी मोठी आहे. त्यांनी घरातून बाहेर पडणं आवश्यक आहे.
४. सायंकाळी ५ वाजता वाजवा टाळी, थाळी किंवा घंटी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासींयाना आवाहन केलंय की, डॉक्टर, पोलीस, माध्यम प्रतिनिधी, सफाई कर्मचारी, होम डिलिव्हरी करणारे यांच्याप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यूच्या दिवशी दरवाजा, खिडकीत उभं राहून सायंकाळी ५ वाजता टाळ्या, थाळी किंवा घंटी वाजवावी. याशिवाय त्यांनी राज्य सरकारांना आवाहन केलं की सर्व शहरांमध्ये सायरन वाजवून जनतेला याची आठवण करून द्यावी.
५. सर्वांत महत्त्वाचं, हात धुवत राहा.
रविवारी जनता कर्फ्यूच्या काळात तुम्ही तुमच्या घरी असला तरी सतत हात धुणे विसरू नका. सतत हात धुवत राहा. किमान प्रत्येक अर्ध्या तासाला हात स्वच्छ धुवा.