मंगळवेढा/प्रतिनिधी
लवंगी ( ता. मंगळवेढा ) येथील भैरवनाथ शुगर्स या साखर कारखान्याचे चालू गाळप हंगामात येणार्या ऊसाला प्रतिटन 2511 रूपये प्रमाणे दर देण्याची जाहीर केली आहे. कारखान्याचे चेअरमन प्रा. शिवाजी सावंत यांनी बुधवारी ही घोषणा केली. दरम्यान चालू गाळप हंगामात ऊसाचा दर जाहीर करणारा भैरवनाथ शुगर्स हा पहिलाच साखर कारखाना ठरला असून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे या निर्णयाचे स्वागत केले आहे.
गेल्या वर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा सोलापूर जिल्ह्यात केवळ 8 साखर कारखान्यांनी गाळप हंगामाला सुरूवात केलेली आहे. गाळप सुरू होऊन सुमारे 3 आठवडे लोटले असले तरी अद्याप एकाही साखर कारखान्याने दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे साखर कारखान्याच्या दराकडे लक्ष लागले होते. बुधवारी कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव सावंत यांनी भैरवनाथ शुगर 2511 रूपये प्रतिटन दर देईल असे जाहीर केले आहे. कारखान्याच्या एफ.आर.पी. रक्कमेपेक्षा जाहीर केलेला दर 575 रूपये जास्त आहे.
भैरवनाथ शुगर्सची एफ.आर.पी. 1936 रूपये असली तरीही शेतकर्यांचे हित लक्षात घेता ऊस उत्पादकांना दिलासा देण्याच्या हेतूने भैरवनाथ शुगर 2511 रूपये प्रतीटन दर देईल असे यावेळी प्रा. सावंत म्हणाले. यावेळी व्हा.चेअरमन अनिल सावंत, जनरल मॅनेजर रविंद्र साळुंखे व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
दरम्यान सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा 2511 रूपयांचा दर जाहीर केल्याबद्दल स्वाभीमानी शेतकरी संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. स्वाभीमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल आणि तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत आणि जनरल मॅनेजर रविंद्र साळूंखे यांचा सत्कार केला.